एकविसाव्या शतकाच्या प्रारंभानंतर मराठी साहित्यविश्वात स्त्री लेखिकांच्या कादंबरी लेखनाने नवे वळण घेतले. १९९० नंतर सुरू झालेल्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचे ठोस परिणाम २००० नंतर स्पष्टपणे दिसू लागले. आर्थिक बदल, स्थलांतर, स्त्रीच्या सामाजिक भूमिकेतील परिवर्तन, मानवी हक्कांची जाणीव आणि जागतिक पातळीवरील मानवी प्रश्न यांचे प्रतिबिंब स्त्री लेखिकांच्या कादंबऱ्यांमधून प्रभावीपणे उमटले. २००० नंतरचा काळ हा जागतिक पातळीवर सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक उलथापालथीचा काळ मानला जातो. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या प्रक्रियांमुळे मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर खोल परिणाम झाला. या बदलांचा प्रभाव मराठी साहित्यावर, विशेषतः स्त्री लेखिकांच्या कादंबरी लेखनावर प्रकर्षाने दिसून येतो. स्त्री लेखिकांनी या काळात केवळ स्त्रीजीवनाचे प्रश्न मांडले नाहीत, तर माणूस म्हणून जगताना येणाऱ्या वेदना, संघर्ष, मूल्यांची घसरण आणि मानवतेचा शोध या व्यापक वैश्वीक मुद्द्यांना आपल्या कादंबऱ्यांमधून अभिव्यक्त केले.
Publication Date: 2026-02-16